ब्लॉगवर आपले स्वागत आहे

शनिवार, १० नोव्हेंबर, २०१२

Samirsinh Dattopadhye: The World Today

Samirsinh Dattopadhye: The World Today: ll Hari Om ll  UN P eace Envoy, Mr. Lakhdar Brahimi Y es indeed Syria paints a distressing picture on the canvas of the world. Is ...

मंगळवार, २२ मे, २०१२

चुका




चुका करायच्या, पुन्हा पुन्हा करायच्या

माहित असल्या तरी कधीच नाही स्वीकारायच्या



कुणी दाखवून दिल्या तर दखल नाही घ्यायची

माफी मागायची तर गोष्टच राहिली दूरची



काहीच झाल्यासारखं वागायचं

गावभर दात विचकत फिरायचं



अशा लोकांशी आहे माझं जन्माच वैर

मला नाही वाटत माझी भूमिका आहे गैर


सोमवार, ८ नोव्हेंबर, २०१०

फितूरी

तुजसाठी केला लढा, तुलाच किंमत उरली नाहि
केलेल्या संर्घषाला आता अर्थच उरला नाहि

ठेवलीस न तमा आटवलेल्या रक्ताची
ऐनवेळी समरांगणी पाडलेस तोंडघशी

थुंकलेस तु चेहर्यावर उलटे परतुनी
अपमानीलेस वारंवार हासुनि खिजवुनी

उतरले झेंडे, म्यान झाल्या तलवारी
जाहल्या जखमा कायम खोलवरी

मानवा, कर जल्लोश क्षणैक विजयाचा
होइल पश्चाताप परी तुजला फितुरीचा

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०१०

वाढदिवस....

आज ह्या ब्लॉगला एक वर्ष पुर्ण झाल... ३६५ दिवस कसे निघुन गेले कळलच नाहि..
ब्लॉग सुरु करताना आपण आठवड्याला एक तरी पोस्ट लिहु असे वाटत होते...
पण तसे झाले नाहि.. आणि हा ब्लॉग ’हवशे नवशे’ ह्या प्रकारात मोडणारा ठरला...
तरीहि २००० च्या वर ब्लॉगविझिटस झाल्या याच आश्चर्य वाटत...
सगळ्यांना धन्यवाद...

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०१०

माँ ... मेरी माँ .. प्यारी माँ.. मम्मा ...

आई. माझी आई. साधी सरळ. ती लहान असतानाच तिची आई म्हणजे माझी आज्जी वारली. मग तीनहि भावंडांचा सांभाळ आजोबांनी केला. आजोबा अतिशय कडक शिस्तीचे. त्यांच्या धाकातच मुलं मोठी झाली. त्यात मुलींना जास्त नियम. सगळ चांगल होत, पण तरीहि आईची माया आणि प्रेम लागतच ना... एकटे वडिल ती कमी कधीच पुर्ण करु शकले नाहित. आईच शिक्षण दहावीपर्यंत झालं. मग बाबांनी बघुन दिलं त्या मुलाशी लग्न झालं त्यावेळच्या प्रथेप्रमाणे. त्याकाळी मुलींना कुठे स्वातंत्र्य होतं आपला नवरा शोधण्याच किंवा मत मांडण्याच. आई-वडिलांनी पसंद केलं कि मुली लग्नाला उभ्या रहायच्या।

लग्न झाल सासरी आली. सासरकडचा सगळा खोटेपणा उघड झाला. अनेक हालअपेष्टा कष्टांना सामोर जाव लागलं. आम्हा तिन्ही मुलांना मोठं केलं. अनेकवेळा तीची नवरा आणि मुलं यांच्यामध्ये कुचंबणा व्हायची. पण सगळं तीने सहन केलं.. मुलांसाठी.. मुलांवर इतक प्रेम कि कोणीहि तिच्या मुलांना नाव ठेवलेल तिला खपायच नाहि. मला आठवतय कोणीतरी सांगितल होतं मुलाच्या कूंडलीत दोष आहे, १२ संकष्ट्यांना उपवास करायचा आणि तो उपवास जमिनिवर (ताटात नाही) जेवुन सोडायचा. तिने तेही केलं, मुलाच चांगल व्हाव म्हणुन. अशा गोष्टींवर आपण विश्वास ठेवत नाहि पण आईची माया... एक आई आपल्या मुलांसाठि काहिही करु शकते हे नक्की. कधीहि मारलं नाहि किंवा कोणतीहि बंधन घातली नाहित. उचित स्वातंत्र्य दिलं।

आमच्या प्रत्येक यशाचं तिला कौतुक असे. मी जेव्हा पहिली गाडी घेतली आणि गाडीत बसुन पहिल्यादिवशी ऑफिसला निघाले तेव्हा आई गॅलरीत उभी होती आणि मला बघायच्याऎवजी मला अजुन बिल्डींगमधले पाहाताहेत ते बघत होती. आपल्या मुलांच कौतुक अजुन कोणी केलं कि तीचा आनंदाने ओसंडुन जाणारा चेहरा पहावा. त्या माउलीने आमच्यासाठी काय नाहि केलं आणि आम्ही मात्र नेहमी तिला ग्रुहित धरलं. कमालीच स्वातंत्र्य असुनहि तिचं अनेकदा ऎकलं नाही. अनेकदा उलट उत्तर दिली. आई अनेकदा आमच्या वागण्याने व्यथित आणि शब्दांनी घायाळ झाली. पण लगेच विसरुन जायची, सोडुन द्यायची. जे मिळाल त्यात सुख मानलं. कधी हेच हवं होत अशी अपेक्षा नाहि केली. कोणाचही कधीच वाईट चिंतल नाही।

आज हे सगळं लिहिण्याच कारण म्हणजे आईचा ७५ वा वाढदिवस. आज प्रथमच आम्ही साजरा करणार. आजवर कधीच केला नव्हता. तिला सरप्राइज देणार. तिला काय भेट देणार? काहीतरी देणार हे नक्की. वैतागेल जरा... कशाला खर्च करायचा, आता मला या वयात हे करायचय... वगैरे वगैरे... खरतर तिच्या आवडत्या छोट्या छोट्या गोष्टी घडवुन आणतोय ह्या आठवड्यात... अजुन तरी तिच्या लक्षात आलेलं नाही. परवा किचनमध्ये आईला मदत करत होते, आमच्या अशाच गप्पा चालल्या होत्या. आईचा आवडता गायक मुकेश. मुकेशच एक गाण मी सहज गुणगुणत होते. आईला मुकेशची गाणी ऎकायची इच्छा झाली. मी गेले कॅसेट शोधायला. घर शिफ्ट केलं तेव्हा बर्याच कॅसेट गहाळ झाल्यात, काही त्यांच्या कव्हरमधुन बाहेर आल्यात. मुकेश ची एक पण कॅसेट सापडेना. आई म्हणाली राहुदे नाही सापडत तर. मीही नाद सोडला आणि एक मिक्स सॉंगची कॅसेट लावली. रफी, मन्ना डे, किशोर सगळ्यांची गाणी लागत होती. पण मुकेशच लागेना. मीच नाराज झाले आणि कॅसेट बदलायला गेले तेवढ्यात तेच गाणं जे मी गुणगूणत होते ते लागलं. आम्ही दोघी खुश. ते गाणं होत - जिक्र होता है जब कयामत का, तेरे जलवोंकि बात होती है' (त्या गाण्याची लिंक इथे द्यायची होती पण नाही देता आली )

आईविषयी मी काय लिहिणार...ती खुप मोठी आहे, मी शब्दात व्यक्त करण्याच्या पलिकडच असं व्यक्तिमत्व आहे तिचं.. मला नीट शब्दच सुचत नाहियेत... आता यापुढे तिला अजिबात दुखवायच नाही हेच मनाशी ठरवलय. आजच्या या विशेष दिवशी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि देवाने माझ्या आईला अजुन खुप खुप मोठ्ठ आणि निरोगी आयुष्य द्याव. हल्ली एका गाण्याच्या दोन ओळी मी गुणगुणत असते आईला बघुन... ’ मा.. मेरी मा... प्यारी मा... मम्मा’.....

शुक्रवार, १४ मे, २०१०

संधीच सोनं

आज कॉलेजमध्ये अगदि लगबग सुरु होती. झाडुन १००% उपस्थिती होती विद्यार्थ्यांची आणि
प्राध्यापक मंडळींचीही. एमबीए मार्केटिंगची अख्खी बॅच हॉलमध्ये पुढच्या जागा अडवुन
बसली होती. अर्थात त्याला कारणही तसचं होत. ख्यातनाम मार्केटिंग गुरु मोहन देसाई
स्पेशल लेक्चर देणार होते. तब्बल एक वर्षाच्या प्रयत्नांनंतर मोहन देसाईंची वेळ मिळवण्यात
कॉलेज व्यवस्थापनाला यश आल होत. मानधनही जबरदस्त मोजलं होतं तेही आगाउ.

मोहन देसाई व्यक्तिमत्वच असं होतं. अनेक रेप्युटेड कंपनीमध्ये त्यांना कन्सल्टंट म्हणुन
नियुक्त केलेल होतं. त्यांच नाव आपल्या कंपनीशी जोडल जाण ही एक सन्मानाची बाब
होती. कॉर्पोरेट जगतात त्यांचा दबदबा होता. अनेक सेमिनार मध्ये त्यांना जावं लागायच.
त्यांनी लिहिलेल पुस्तक सिलॅबसमध्ये होत आणि इतर अनेक पुस्तक हॉट सेलिंग रेंज
मधली होती. महिन्यातले पंधरा दिवस ते परदेशातच असायचे. चारीबाजुंनी पैसाच पैसा,
परदेशात घर,मूंबईत सीफेसिंग फ्लॅट, चार चार गाड्या, जोडीला मानसन्मान आणि आदर.
कन्सल्टन्सीबरोबरच लेक्चर देणे/शिकवणे त्यांना आवडायच आणि केवळ म्हणुनच
सकाळी अमेरिकेतुन भारतात परत आल्यावरदेखिल या कॉलेजमध्ये येण्यासाठी ते निघाले
होते.

मर्सिडिज कॉलेजच्या आवारात शिरली, देसाईसर उतरले. स्वागत, सत्कार झाले. मोहन देसाई
स्पीच द्यायला उभे राहिले. विषयात हातखंडा, अनेक उदाहरण देत, सगळ्यांना गमती-जमती
सांगत मार्केटिंगचे एक एक फंडे ओघवत्या भाषेत सर मांडत होते. सगळे मंत्रमुग्ध होऊन
ऎकत होते. तीन तास नॉनस्टॉप कसे गेले कळलेच नाही कोणाला. सर शेवटच्या मुद्दा मांडत
होते - वेल, प्रत्येक संधीच सोन करणं आणि यशस्वी होणं हे आपल्या हातात असतं.
परिस्थिती प्रतीकुल असेल तर ती आपल्याला हवी तशी चेंज करायची आणि ती चेंज करणं
शक्य नसेल तर स्वतःला चेंज करायच पण नेहमी प्रत्येकाने यशस्वीच व्हायच. ह्याच एक
उदाहरण देतो. २५ वर्षांपुर्वीची सत्यघटना आहे.एकदा एका मोठया चप्पल कंपनीने दोन
सेल्समन नियुक्त केले. दोघांना एका लांबच्या गावी जाउन सेल करण्याची पहिली असाइनमेंट
दिली. दोघही एकाच ट्रेनने निघाले होते, वेगवेगळ्या डब्यात होते आणि एकमेकांना ओळखतहि
नव्हते. दोघ ते स्टेशन येताच उतरले. गावात शिरताच त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली कि
या गावात कोणी चप्पलच वापरत नाही. पहिली पोस्टिंग ती पण या गावात..आता काय
कराव? पहिल्या सेल्समनने विचार केला आणि त्याने हेडऑफिसला फोन लावला. मॅनेजरला
म्हणाला या गावात कोणी चप्पलच वापरत नाही, इथे काहि सेल होणार नाही. मी पुढच्या
ट्रेन ने परत येतोय. आणि तो स्टेशनच्या दिशेने परत निघाला रिर्ट्न तिकिट बुक करायला.
द्सर्या सेल्समनने पण विचार केला आणि त्याने हेडऑफिसला फोन लावला. मॅनेजरला
म्हणाला या गावात कोणी चप्पलच वापरत नाही, इथे खुप स्कोप आहे. एक काम करा
आपल्या स्टॉकमध्ये जितका माल असेल तो सगळा इथे पाठवुन द्या. मी सगळा विकतो.
आणि तो बोलला तसं त्याने केलं. आज तो त्याच नामवंत कंपनी मध्ये मार्केटिंग हेड आहे
आणि फॅट सॅलरी घेतोय. सो फ्रेन्डस, दॅटस इट, IF YOU CANT CHANGE THE
SITUATION, CHANGE YOURSELF AND JUST GRAB THE SUCCESS. THANKS.
टाळ्यांचा कडकडाट झाला.

देसाई स्टेजवरुन खाली उतरणार इतक्यात एका विद्यार्थ्याने विचारलं ’सर, तो दुसरा सेल्समन
तर मार्केटिंग हेड झाला, यशस्वी झाला. पण पहिल्याच काय झाल? तो आज कुठे असेल?
तो अयशस्वी झाला? त्याच्याविषयी सांगा ना’ देसाईंनी एक क्षण त्या मुलाच्या नजरेला नजर
दिली. मग एक मंद स्मित देत म्हणाले ’ वेल, यंगमॅन, तो पहिला सेल्समन आज तुमच्या
समोर उभा आहे. मीच तो. मला वाटत अधिक स्पष्ट करायची गरज नसावी.’ हॉलमध्ये पुन्हा
एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. देसाई विद्यार्थ्यांना ऑटोग्राफस देत देत मर्सिडिज मध्ये
बसुन परत निघाले.

शुक्रवार, २३ एप्रिल, २०१०

वाढते व.....

लहानपणी ’काय बाई सांगु, कसं गं सांगु, मलाच माझी वाटे लाज, वजनाचा काटा मोडला आज’ हे गाण गाउन जाड्या लोकांची जाम टर उडवायचो आम्ही. खुप हसायचो. तेव्हा गम्मत वाटायची, पण आता...... हल्ली वजन जरा अंमळ जास्तच वाढलय. जास्त म्हणजे दिवसातुन एकदा तरी वजन वाढतय कमी करा अशी कमेंट ऎकायला मिळ्ते आणि ते कमी करण्य़ासाठी उपायही सुचवले जातात. उपाय अनेक उदा.
१) दुधीभोपळ्याचा रस अथवा पावडर खा २) जीम जॉईन करा ३) हाय कॅलरी फुड बंद करा ४) अमुक गोळ्या सुरु करा ५) अमुक डायटिशन कडे जा ६) फक्त फळ, सुप आणि सॅलेड खा, इतर जेवण बंद करा ७) सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यात मध आणि लिंबु घालुन प्या ८) माझे सगळे आवडते पदार्थ (पावभाजी, वडापाव, पिझ्झा, चॉकलेट, आइसक्रिम, समोसा, वेफर आणि बरेच..) ज्यांची गणना जंक फुड मध्ये होते ते बंद करणे. ९) दिवसभर गरम पाणी पित राहणे. असे आणि असे अनेक उपाय सुचवण्यात आले आहेत.

हे सगळ ऎकुन त्रस्त झालेय मी आणि वजन कमी करायचा निर्णय घेतलाय. अर्थात लोकांच्या कमेंट्स हे एकमेव कारण नाहि तर हल्ली चालण्याचा वेग जरा मंदावल्यासारखा वाटतोय आणि वजन अजुन प्रमाणाबाहेर वाढले तर कमी करणे कठीण जाईल असे वाटतय. तर ... एकुण ८ किलो वजन कमी करण्याचा मानस आहे. इतक वजन कमी करायला किमान एक वर्ष तरी लागेल अस अनुभवी लोकांच मत आहे. त्यासाठी काही झेपतील(?) असे अत्याचार स्वत:वर करणार आहे - १) रोज १ तास (किमान अर्धा तास) चालणे (नेमकं कधी हा मोठा प्रश्न आहे ) २) भात(खुप कठिण आहे), बटाटा आणि साखर बंद करणे ३) रोज ३ लिटर (खुप होतं हे) पाणी पिणे ४) सो कॉल्ड ’जंक’ फुड बंद (जुलुम) ५) रात्री जमल्यास न जेवता फक्त सुप आणि फळांवर राहणे (हा पर्याय मी लास्टला ठेवलाय)
हे सगळं काल ठरवल आणि आज सकाळी नेहमीप्रमाणे निद्रादेवीचा विजय झाला आणि चालायला जायचं राहिलं. सकाळपासुन ३ चहा झाले त्यात एक बिनसाखरेचा होता. दुपारी डबा खाताना कोणाच्या तरी डब्यातुन आलेला ’पालक पनीर आणि आलुफ्राय’ खाल्ल (नाहि म्हटल तर समोरच्याला वाईट वाटेल म्हणुन). पाणी फक्त दोन ग्लास प्यायल गेलाय. आणि ऑफिस मध्ये एकाचा वाढदिवस आहे तर आइसक्रिम मागवलय. असो आज जरी माझ्या वेट कंट्रोल प्लानचे बारा वाजले असले तरी मी अजुन हार मानली नाहीये. हे मिशन पार पाडायचेच आहे.